जलबचतीची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करण्याचे आवाहन
परभणी : पाणी ही सर्वांत महत्त्वाची संपत्ती आहे. म्हणूनच पाण्याचे महत्त्व पटवण्यासाठी २२ मार्च रोजी जागतिक जलदिन साजरा केला जातो. परभणीत त्या निमित्ताने जलमित्र प्रतिष्ठानतर्फे वसमत रोडवरील यलदरकर कॉलनीतील हनुमान मंदिर प्रांगणात जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जलसंवर्धनाचा व पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जलसंकटाची तीव्रता लक्षात घेऊन पाण्याचा योग्य वापर, साठवण आणि संवर्धन करण्याचे आवाहन डॉ. राजगोपाल कालानी यांनी या वेळी केले. पुरातन विहिरीच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प करण्यात आला. जलमित्र प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की पाणी वाचवणे ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात पाणीबचतीच्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत. तसेच भविष्यातील पिढ्यांसाठी जलसंपत्ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे.
उपस्थित सर्व नागरिकांनी पाणीबचतीची शपथ घेतली आणि सर्वांनी जलसंवर्धनाचा निर्धार केला. या वेळी जलमित्र प्रतिष्ठानचे नवनिर्वाचित अध्यक्ष व नगरसेवक शंकरजी आजेगावकर यांनी जलबचतीचे महत्त्व विशद केले. जलबचतीची सुरुवात स्वतःपासून करावी, असे त्यांनी सांगितले. या वेळी जलमित्र संस्थेचे सचिव सुरेश नाईकवाडे, आयुर्वेद व्यासपीठाचे वैद्य गुरुदत्त चौधरी आणि जलदूत, तसेच अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे उपस्थित होते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment