अमृत परिवार सर्वेक्षणातील रायगड जिल्ह्यातील अनुभवांच्या नोंदी
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यातील काही अनुभव....
रायगड जिल्ह्यामध्ये अमृत परिवार सर्वेक्षण करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. हा प्रवास फक्त कामाचा भाग नसून अनेक नवीन लोकांशी ओळखी झाल्या. अनेक लोकांच्या समस्या, गरजा जाणून घेता आल्या आणि अमृत संस्थेकडून लोकांच्या अपेक्षा काय आहेत, याचा अभ्यासही करता आला.
गावागावातून प्रवास करताना अनेक कुटुंबांना प्रत्यक्ष भेटलो. या परिवार सर्वेक्षणामध्ये अनेकांनी स्वतःहून भाग घेतला. आपला वेळात वेळ काढून सर्वेक्षण करताना ते बरोबर फिरले. समाजाची सद्य परिस्थिती, अपेक्षा, गरजा यांचा अभ्यास करायला मिळाला. काही कुटुंबांना अमृत संस्थेबद्दल माहितीच नव्हती याचीही जाणीव झाली.
अमृत परिवार सर्वेक्षण करताना अनेक जणांनी आमचे आत्मीयतेने स्वागत केले. काही जणांनी प्रेमाने जेवणाचा आग्रह केला, तर काही ठिकाणी सरबत, चहा-कॉफी घेतली. खूप ठिकाणी विचारांची देवाणघेवाण झाली. आपल्यासाठी कोणती तरी संस्था काम करत आहे, हे अनेकांना कळले. अनेक ठिकाणी उदासीनताही दिसली, तर काही ठिकाणी काही तरी नवे करायची प्रबळ इच्छा जाणवली. अनेक ठिकाणी गैरसमज व शंकांचे निरसन करताना मतभेदही झाले. सर्वेक्षण करताना अनेक अनुभवी व्यक्तींच्या भेटी झाल्या. त्यांच्याकडून खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले. अमृत परिवार सर्वेक्षण करत असताना सर्वांना आवर्जून प्रेमाने आणि आत्मीयतेने सांगितले, की आपले परिचित व नातेवाईकांना संस्थेची नक्की माहिती द्या.
परिवार सर्वेक्षण करताना प्रत्येक दिवस नवीन अनुभव देत होता. कुटुंब चालवताना अनेकांना किती संघर्ष करावा लागत आहे, याची उदाहरणे जवळून बघायला मिळाली. कोणी नारळाच्या पातींपासून झाडू बनवण्याचे काम करत आहे, तर कोणी आपल्याला मिळणाऱ्या खूपच कमी पेन्शनवर आपला उदरनिर्वाह करत आहे.
एकंदरीत, अमृत परिवार सर्वेक्षण खूप चांगल्या पद्धतीने पार पडले. यामध्ये नवीन ओळखी झाल्या, नवे अनुभव मिळाले. समाजाच्या असलेल्या अपेक्षा आणि अमृत संस्थेने काय केले पाहिजे या सर्व गोष्टींचाही अंदाज आला. त्याचा पुढील काम करताना चांगला उपयोग होईल अशी आशा आहे. या सर्व संधीसाठी, अनुभवासाठी आणि या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल अमृत संस्थेचा खूप खूप मनापासून आभारी आहे.
मंगेश भागुराम ढेबे
रायगड जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment