अमरावती जिल्ह्यातील काही नोंदी
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. अमरावती जिल्ह्यातील काही अनुभव....
अमृत परिवार सर्वेक्षणादरम्यान नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला. या सर्वेक्षणामध्ये समाजातील अनेक वेदनादायी आणि वास्तववादी चित्रे दिसली. काही ठिकाणी वृद्ध आई-वडील एकटे राहत असल्याचे दिसून आले, तर काही कुटुंबांमध्ये बेरोजगारी, आर्थिक अडचणी आणि शिक्षणासाठी आवश्यक साधनांची कमतरता जाणवली. अनेक ठिकाणी युवक रोजगारासाठी बाहेरगावी किंवा विदेशात स्थायिक झाल्यामुळे वृद्ध पालक भावनिक आधाराविना जीवन जगताना दिसले.
सर्वेक्षणादरम्यान एका वृद्ध दाम्पत्याशी संवाद साधताना त्यांची वेदना मनाला स्पर्श करून गेली. मुलांच्या भविष्यासाठी संपूर्ण आयुष्य मेहनत करण्यात गेले; मात्र आज वृद्धापकाळात सोबत देण्यासाठी कोणी जवळ नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बोलताना त्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू समाजातील बदलत्या वास्तवाचे जिवंत चित्र दाखवून गेले.
काही ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे आवश्यक सुविधा नसल्याचे, तर काही कुटुंबे शासनाच्या योजनांपासून अजूनही वंचित असल्याचे दिसून आले. अनेक नागरिकांनी रोजगार, आरोग्य व सामाजिक आधार याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या.
या सर्वेक्षणाअंती अशी अनेक प्रकारची परिस्थिती जवळून पाहताना मन अस्वस्थ झाले. समाजामध्ये अजूनही अनेक कुटुंबे संघर्षमय जीवन जगत असून, त्यांना आधार, मार्गदर्शन आणि संवेदनशील सहकार्याची आवश्यकता आहे, हे स्पष्टपणे जाणवले. समाजासाठी आणखी किती काम करण्याची गरज आहे, हे वास्तव या सर्वेक्षणातून डोळ्यांसमोर उभे राहिले.
ऋषीकेश कथलकर
अमरावती जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment