वर्धा जिल्ह्यातील काही नोंदी
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. वर्धा जिल्ह्यातील काही नोंदी...
अमृत परिवार सर्वेक्षणांतर्गत वर्धा जिल्ह्यातील आष्टी, आर्वी आणि कारंजा तालुक्यातील गावांना भेटी देण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. याद्वारे ग्रामीण भागातील सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. ग्रामस्थांशी संवाद साधून शासकीय योजनांची माहिती देणे आणि त्यांच्या समस्या जाणून घेणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या भेटीमध्ये ग्रामस्थांशी थेट संवाद साधून गावांमधील सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती समजून घेतली.
या उपक्रमांतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाची माहिती, सदस्यांची संख्या, शिक्षणाची स्थिती, व्यवसाय आणि शेतीची अवस्था, तसेच पायाभूत सुविधांची नोंद करण्यात आली. स्वच्छता, आरोग्य, महिला सहभाग आणि युवकांची भूमिका यांकडेही विशेष लक्ष देण्यात आले.
भेटीमध्ये असे आढळले, की अनेक ठिकाणी नागरिकांना शासकीय योजनांची पुरेशी माहिती नाही. त्यांना आवश्यक कागदपत्रे आणि अर्जप्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनीही या कामात सकारात्मक सहकार्य केले. ग्रामीण भागात जनजागृती वाढवण्यासाठी आणि विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला आहे.
- धीरज राठी
वर्धा जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment