वर्धा जिल्ह्यातील काही अनुभव
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. वर्धा जिल्ह्यातील काही अनुभव...
अमृत परिवार सर्वेक्षण अभियानाची सुरुवात आठ एप्रिल २०२६ पासून करण्यात आली. या अभियानामागील मुख्य उद्देश केवळ माहिती संकलन करणे हा नव्हता, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना शासनाच्या योजनांशी जोडणे हा होता. गावागावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून घेणे, त्यांच्याशी विश्वासाचे नाते निर्माण करणे आणि अमृत ही संस्था त्यांच्या प्रगतीसाठी कार्य करत आहे हा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करणे, हे या अभियानाचे खरे यश ठरले.
मी वर्धा, हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू आणि देवळी तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन सर्वेक्षण केले. गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आशा कार्यकर्त्या, बचत गटांतील महिला, तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या माध्यमातून गावातील लक्ष्यित गटांतील कुटुंबांपर्यंत पोहोचून त्यांना अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
या अभियानातून अनेक नागरिकांना प्रथमच समजले, की शासन त्यांच्या उन्नतीसाठी एवढ्या विविध योजना राबवत आहे. टायपिंग प्रशिक्षणापासून ड्रोन प्रशिक्षणापर्यंत, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनापासून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनांपर्यंत अनेक संधी त्यांच्या समोर मांडण्यात आल्या. ही माहिती ऐकून अनेक युवक-युवतींच्या डोळ्यांमध्ये नवीन स्वप्ने निर्माण झाली, तर महिलांमध्ये आत्मविश्वास वाढताना दिसून आला.
प्रत्येक गावामध्ये जनजागृतीसाठी पोस्टर्स लावण्यात आली आणि अमृत संस्था समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्य करत आहे हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला. अनेक कुटुंबांनी उत्साहाने पुढाकार घेऊन स्वतःची माहिती नोंदवली. काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थी मिळाले, तर काही गावांमध्ये अजूनही जनजागृतीची गरज असल्याचे जाणवले. परंतु प्रत्येक गावामधून मिळालेला प्रेमळ प्रतिसाद हा या अभियानाचा सर्वांत मोठा आधार ठरला.
सेवाग्राम, भूगाव, धानोरा, साखरा, तरोडा, आन्जी मोठी, वायफड, डोरली, नागठाणा, बोरगाव मेघे, हिंगणघाट, देवळी, पुलगाव, समुद्रपूर, गिरड, सेलू, सिंधी, केळझर आणि इतर अनेक गावांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या अभियानामुळे नागरिक आणि अमृत संस्था यांच्यातील संपर्क अधिक मजबूत झाला असून, भविष्यात शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा विश्वास निर्माण झाला आहे.
गावागावात जाऊन केलेला हा संवाद म्हणजे केवळ सर्वेक्षण नव्हते, तर समाजाच्या प्रगतीसाठी उभारलेला विश्वासाचा पूल होता.
- ऋषीकेश खराटे
वर्धा जिल्हा व्यवस्थापक, अमृत
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment