अधिक मासात आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण
पुरुषोत्तमपुरी हे बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यात पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक धार्मिक क्षेत्र आहे. भगवान पुरुषोत्तमाचे भारतातील एकमेव मंदिर म्हणून या क्षेत्राची ओळख असून, अधिक मासात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. श्रद्धा, पुराणकथा, इतिहास आणि अद्भुत स्थापत्यकलेचा संगम लाभलेले हे क्षेत्र महाराष्ट्राच्या धार्मिक वैभवातील एक महत्त्वाचे स्थान मानले जाते.
अधिक मास आणि पुरुषोत्तम मंदिराचे महत्त्व
अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास किंवा धोंड्याचा महिना असेही म्हटले जाते. 'धोंडे महात्म्य' या ग्रंथानुसार वर्षातील बारा महिन्यांचे बारा देवस्वामी आहेत; मात्र अतिरिक्त निर्माण झालेल्या अधिक मासाचे स्वामित्व कोणत्याही देवतेने स्वीकारले नव्हते. तेव्हा भगवान विष्णूंनी स्वतः हा महिना स्वीकारून त्याला 'पुरुषोत्तम मास' हे नाव दिले. त्यामुळे अधिक मासात भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यंदाचा अधिक मास १७ मे २०२६ ते १५ जून २०२६ या कालावधीत साजरा केला जात आहे. या महिन्यात भगवान पुरुषोत्तमाची पूजा, जप, दानधर्म आणि तीर्थदर्शन विशेष पुण्यकारक मानले जाते.
दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात पुरुषोत्तमपुरी येथे महिनाभर मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या काळात गोदावरी स्नान, पूजा-अर्चा, हरिनाम सप्ताह, भजन-कीर्तन, दानधर्म आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
शार्दूल राक्षस आणि चक्रतीर्थाची आख्यायिका
पुराणानुसार प्राचीन काळात हा परिसर दंडकारण्याचा भाग होता. शार्दूल नावाच्या राक्षसाने पंचक्रोशीतील जनतेला त्रस्त केले होते. त्या वेळी भगवान विष्णूंनी पुरुषोत्तम अवतार धारण करून सुदर्शन चक्राच्या साह्याने त्या राक्षसाचा वध केला. त्यानंतर त्यांनी ते चक्र गोदावरीच्या पाण्यात धुतले. त्यामुळे या पवित्र स्थळाला 'चक्रतीर्थ' असे नाव प्राप्त झाले.
आजही भाविक प्रथम गोदावरीत स्नान करून चक्रतीर्थाचे दर्शन घेतात आणि त्यानंतर भगवान पुरुषोत्तमाच्या मंदिरात दर्शनासाठी जातात. मंदिरासमोरून वाहणारी गोदावरी आणि परिसरातील शांत वातावरण भाविकांना आध्यात्मिक समाधान देते.
मंदिराची वैशिष्ट्ये
हे मंदिर तेराव्या शतकातील हेमाडपंती स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. मंदिर पूर्वाभिमुख असून, गाभाऱ्यात काळ्या पाषाणातील भगवान पुरुषोत्तमाची सुमारे तीन फूट उंचीची सुंदर मूर्ती आहे. मूर्तीच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म आहेत. सावळ्या विठ्ठलासारखे हे रूप भाविकांना विशेष आकर्षित करते.
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या बांधकामात वापरलेल्या काही विटा पाण्यावर तरंगतात अशी श्रद्धा आजही भाविकांमध्ये आहे. त्यामुळे हे मंदिर स्थापत्यशास्त्र आणि इतिहासाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्वाचे मानले जाते.
त्रिवेणी संगम मंदिर
मुख्य मंदिराशेजारीच त्रिवेणी संगम मंदिर आहे. या मंदिरात वरदविनायक गणपतीची सुमारे चार फूट उंचीची मूर्ती, माता पार्वतीच्या पादुका, सहालक्षेश्वर महादेवांची शिवपिंड असा अद्वितीय संगम एकाच ठिकाणी पाहायला मिळतो. या मंदिराच्या गाभाऱ्याची रचना वृंदावनातील कृष्णमंदिराच्या प्रतिकृतीसारखी असल्याचे मानले जाते.
इतिहास आणि पुरातन वारसा
इतिहासानुसार हे मंदिर इ. स. १३१०च्या सुमारास यादवकालीन राजा रामचंद्र यादव यांच्या काळात त्यांचे मंत्री पुरुषोत्तम यांनी बांधले. त्यामुळेच या गावाला पुरुषोत्तमपुरी हे नाव पडल्याचे सांगितले जाते.
या क्षेत्राला ऐतिहासिकदृष्ट्याही मोठे महत्त्व आहे. रामचंद्र यादव यांचा ताम्रपट येथे सापडला असून, तो आकार आणि वजनाने मोठा मानला जातो. या ताम्रपटात मंदिरासाठी जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. हे ताम्रपट सध्या उस्मानिया विद्यापीठ येथे जतन करण्यात आले आहेत.
गोदावरी नदी कोरडी पडलेल्या काळात नदीपात्रात अनेक पुरातन अवशेष आढळले होते. त्यामध्ये कोरीव दगड, घडीव शिळा, स्तंभ, सतीची शिळा तसेच प्राचीन घाटाचे अवशेष सापडले. इतिहास संशोधकांच्या मते हा घाट यादवकालापूर्वीचाही असू शकतो.
भक्तीपरंपरा आणि सेवा कार्य
पुरुषोत्तमपुरी येथे भक्त पूर्णाश्रमस्वामी यांचा मठ आहे. गावातील भजनी मंडळी आणि भाविकांनी अनेक वर्षे मंदिराच्या जतनासाठी मोठे योगदान दिले. १९८०मध्ये बाबूराव सहदेव गोळेकर यांनी पुरुषोत्तम देवस्थान विश्वस्त संस्था नोंदणीकृत केली. त्यानंतर मंदिराचा टप्प्याटप्प्याने जीर्णोद्धार करण्यात आला.
आजही अधिक मासात अब्बड परिवाराच्या वतीने भाविकांसाठी निःशुल्क महाप्रसादाची सेवा चालवली जाते. राज्य शासनानेही या मंदिराचे धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्व लक्षात घेऊन विकास आराखडा मंजूर केला असून, परिसरात विविध सुविधा उभारण्यात येत आहेत.
पुरुषोत्तमपुरी येथे कसे जाल?
रस्त्याने - माजलगावपासून पुरुषोत्तमपुरी सुमारे २२ किलोमीटर अंतरावर आहे. बीड, परळी, अंबाजोगाई, गेवराई आदी भागांतून रस्त्याने सहज पोहोचता येते. अधिक मासात विशेष बस आणि खासगी वाहनांची सुविधा उपलब्ध असते. माजलगाव बसस्थानकातून पुरुषोत्तमपुरीसाठी एसटी बस व खासगी वाहने उपलब्ध असतात. यात्रेच्या काळात परिवहन मंडळाकडून अतिरिक्त बस सोडल्या जातात.
रेल्वे - जवळची प्रमुख रेल्वेस्थानके : परळी वैजनाथ, जालना, छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर रस्त्याने माजलगावमार्गे पुरुषोत्तमपुरी येथे पोहोचता येते.
भेट देण्यासाठी योग्य काळ
अधिक मास हा येथे भेट देण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा आणि धार्मिकदृष्ट्या विशेष काळ मानला जातो; मात्र गर्दी टाळायची असल्यास इतर दिवसांतही हे मंदिर शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य वातावरणात अनुभवता येते.
श्रद्धा, इतिहास, पुराणकथा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर पुरुषोत्तमपुरी हे क्षेत्र निश्चितच भेट देण्यासारखे आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment