अनुभवता आली माणुसकी; अमरावतीतील काही अनुभव
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. वाशिम जिल्ह्यातील काही अनुभव...
अमृत सर्वेक्षणादरम्यान अनेक चांगले, तसेच काही कठीण अनुभव आले. अमरावतीतील लोकांशी संवाद साधताना त्यांच्या जीवनातील वास्तव परिस्थिती जवळून पाहता आली. अनेक जणांनी अमृत संस्थेचे मनापासून स्वागत केले व अमृत संस्थेबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली. मी ज्या कुटुंबांना भेटले, त्यापैकी काहींची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. एका ठिकाणी घरावर ताडपत्रीचे छत आणि वर मोडके टीन असल्याचे पाहिले. पावसाळ्यात त्या घरात पाणी गळते. त्यांची परिस्थिती खूप हलाखीची आहे. तरीही त्यांच्या चेहऱ्यावर दुःख नव्हते. उलट त्यांनी आमच्याशी प्रेमाने संवाद साधला आणि सहकार्य केले. आम्ही त्यांना विविध योजना समजावून सांगितल्या. अमृत संस्थेशी जोडले गेल्यास व्यवसाय वाढवण्यासाठी मदत मिळू शकते, हे ऐकून त्यांना आशा वाटली.
पूर्वी योजनांचा लाभ घेतलेल्या काही लोकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला, तर काहींना सर्वेक्षणामुळे अमृत संस्था ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी तळागाळात उतरून काम करणारी संस्था आहे, हे समजले. याशिवाय, मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठीही अमृत संस्थेच्या योजनांचा उपयोग होऊ शकतो, हे लोकांना पटले. सर्वेक्षण करताना असेही जाणवले, की पायाभूत सुविधांचा फार विकास न झालेल्या भागातील लोक आजही मोठ्या प्रमाणावर माणुसकी जपून आहेत. भर उन्हात नागरिकांच्या घरी गेल्यावर प्रेमाने सरबत दिले आणि आपुलकीने स्वागत केले.
एकूणच, अमृत सर्वेक्षण करताना मला समाजातील वास्तव परिस्थिती समजली आणि लोकांमध्ये आशा निर्माण करण्याचे कार्य करता आले. हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आणि समाधानकारक ठरला.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment