अमृत परिवार सर्वेक्षणावेळी घेण्यात आली समस्येची दखल; प्रशासनाचीही सकारात्मक भूमिका
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यातील अनुभव...
अमृत परिवार सर्वेक्षणावेळी गोरठा येथील आर्यवैश्य समाजातील एका कर्णबधिर व्यक्तीच्या समस्येची दखल घेऊन सामाजिक बांधिलकीतून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. संबंधित व्यक्तीची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, कुटुंबाकडे केवळ तीन एकर जमीन आहे. त्यांना शासनाकडून मिळणारे मानधन अनेक दिवसांपासून मिळत नव्हते. उत्पन्नाचे कोणतेही ठोस साधन नसल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ही बाब समजताच उमरी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार मॅडमची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. संबंधित कुटुंबाची संपूर्ण परिस्थिती, त्यांची आर्थिक अडचण व शासनाच्या योजनेपासून वंचित राहण्याचे कारण याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तहसीलदार मॅडम यांनी तातडीने कार्यवाही करून संबंधित व्यक्तीला शासनाचे मानधन मिळवून देण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू करण्याची ग्वाही दिली. काही दिवसांत ही समस्या मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सामाजिक संवेदनशीलतेतून केलेल्या या प्रयत्नामुळे गरजू व्यक्तीला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली असून, प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेचेही नागरिकांकडून स्वागत होत आहे.
विश्वेश्वर वासुदेवराव जोशी
नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment