शासकीय टायपिंग-शॉर्टहँड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मिळाला लाभ
बीड : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवते. त्याचाच एक भाग म्हणून जीसीसी-टीबीसी अर्थात शासकीय टंकलेखन व लघुलेखन परीक्षा शुल्क परतावा योजना राबवली जाते. त्या योजनेचा लाभ बीड जिल्ह्यातील २३ विद्यार्थ्यांना मिळाला आहे.
मराठी व इंग्रजी टायपिंग आणि लघुलेखन ही शासकीय सेवेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी परीक्षा आहे. जून २०२५मध्ये ही परीक्षा (Mar-30, Mar-40, Eng-30, Eng-40, Eng-60, Eng-100) यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्यानंतर बीड जिल्ह्यातील २३ विद्यार्थ्यांना अमृत संस्थेमार्फत संपूर्ण अभ्यासक्रम शुल्काचा परतावा देण्यात आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या परताव्याची ही रक्कम एकूण दोन लाख २० हजार रुपये असून. ती रक्कम थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शासकीय टंकलेखक व लघुलेखक पदासाठी आवश्यक पात्रता मिळाल्याने या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, शासकीय सेवेकडे वाटचाल करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
या उपक्रमाबाबत अमृत संस्थेचे बीड जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी सांगितले, की खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांनी शिक्षण व कौशल्याच्या माध्यमातून सक्षम व्हावे, हा अमृत संस्थेचा मुख्य उद्देश आहे. बीड जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांनी अमृत संस्थेच्या इतर योजनांची माहिती घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अमृत संस्थेच्या या उपक्रमामुळे बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अशा प्रकारचे शैक्षणिक व कौशल्यविकासाचे उपक्रम सातत्याने राबवले जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65468
पत्ता : अमृत संस्थेचे बीड जिल्हा कार्यालय,
अथर्व कॉम्प्लेक्स, नवगण कॉलेज रोड,
वाघ नेत्रालयाशेजारी, बीड
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment