बोधकथा - ३६
भारतीय संस्कृतीत अनेक उत्तमोत्तम परंपरा आहेत. गुरू-शिष्य परंपरा ही त्यापैकीच एक. कलाकार तर परमेश्वरानंतर सर्वाधिक आदर गुरूलाच देतात. अनेक शिष्य गुरूंना साक्षात ईश्वरस्वरूप मानतात; मात्र काही जणांचे विचार गुरूची महती कळेपर्यंत वेगळे असतात. गुरूची नेमकी गरज काय, असा प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित होतो.
असाच प्रश्न एकदा एका शिष्याने रामकृष्ण परमहंस यांना विचारला. 'ठाकूरजी, शिष्याच्या आयुष्यात गुरूचे स्थान नेमके कोणते असते? गुरूंचा आयुष्यात नेमका उपयोग कसा होतो?”
ते किनाऱ्यावर बसले होते. त्यामुळे रामकृष्णांनी लगेच त्याचे लक्ष समोर दिसणाऱ्या छोट्या होडीकडे वेधले आणि त्याला विचारले, “आपल्याला या होडीतून पलीकडे जायला किती वेळ लागेल?”
शिष्याने उत्तर दिले, “ती होडी खूप छोटी आहे. त्यामुळे बराच वेळ लागेल.”
मग रामकृष्णांनी त्याला विचारले, “हीच होडी आपण एखाद्या मोठ्या जहाजाला बांधली, तर काय होईल?”
शिष्य लगेच म्हणाला, “मग आपण अगदी कमी वेळात तिकडे पोहोचू.”
रामकृष्ण म्हणाले, “गुरूचे महत्त्व हेच आहे.”
जे साध्य करण्यासाठी शिष्याला अनेक वर्षांची साधना करावी लागते, तेच गुरूच्या मार्गदर्शनाने अधिक सोपे आणि लवकर साध्य होते.
बोध : यशस्वी होण्यासाठी आयुष्यात गुरूचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment