सहा मार्च हा प्रसिद्ध साहित्यिक रणजित देसाई यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा अल्प परिचय...
काही साहित्यिकांच्या कलाकृती अजरामर आहेत. असेच एक साहित्यिक म्हणजे रणजित देसाई. श्रीमान योगी, स्वामी या त्यांच्या कादंबऱ्या वाचल्या नाहीत, असा कोणी मराठी वाचक नसेल. त्यांचा जन्म आठ एप्रिल १९२८ रोजी कोल्हापूरमध्ये झाला. रणजित देसाई हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबर्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील 'श्रीमान योगी' आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील 'स्वामी' या त्यांच्या कादंबर्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. त्यांना 'स्वामी'कार या नावानेही ओळखले जाते.
मराठीत ऐतिहासिक कादंबरी लेखनाची मोठी परंपरा आहे. रणजित देसाई हे या नामावलीतील फार वरचे नाव. छत्रपती शिवाजी महाराजांवरील त्यांची 'श्रीमान योगी' ही मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरी गणली जाते. या कादंबरीला इतिहास अभ्यासक नरहर कुरुंदकर यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. या कादंबरीतून त्यांनी महाराजांचे जीवन आणि त्याचबरोबर स्वराज्यासाठी त्यांनी घेतलेले कठोर परिश्रम याविषयीचे वर्णन बारकाईने केले आहे. १९६२मध्ये त्यांनी थोरल्या माधवराव पेशव्यांच्या जीवनावर 'स्वामी' ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. तिच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. 'स्वामी' ही मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक कादंबरी. ती वाचताना वाचकाला त्या काळातील पेशवाईतील ऐश्वर्य, जीवन, कौटुंबिक कलह, माधवरावांची कर्तव्यकठोरता, राघोबाची कारस्थाने, माधवराव-रमाबाई यांचे नाते, त्याग या सर्वच गोष्टी समोर घडत आहेत, असे वाटते. पेशव्यांच्या निधनानंतर सतीच्या सहगमनाचा प्रसंग काळजाचा ठाव घेणारा रेखाटला आहे.
याशिवाय देसाईंची 'पावनखिंड' ही आणखी एक ऐतिहासिक कादंबरी. त्यांची 'राधेय' ही कर्णावरची कादंबरीही लोकप्रिय आहे. ग्रामीण साहित्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. 'सवाल माझा ऐका', 'रंगल्या रात्री' या गाजलेल्या चित्रपटांच्या कथाही त्यांच्याच. बारी, माझे गाव, लक्ष्यवेध, समिधा, राजा रविवर्मा, अभोगी, प्रतीक्षा, शेकरा या कादंबर्याही त्यांनी लिहिल्या. रूप महाल, मधुमती, जल कालवा, गंधाली, अलख, मोरपंखी सावल्या, कातळ, बाबुलमोरा, संकेत, प्रपात, मेघा, वैशाखी, आषाढ हे त्यांचे कथासंग्रह. त्याचप्रमाणे कांचनमृग, धन अपुरे, पंख झाले वैरी, स्वरसम्राट तानसेन, गरूडझेप, रामशास्त्री, पांगुळवाडा, लोकनायक, हे बंध रेशमाचे, तुझी वाट वेगळी, सावली उन्हाची इत्यादी नाटकेही त्यांनी लिहिली.
त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. १९७३मध्ये पद्मश्री देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या 'स्वामी' या कादंबरीला महाराष्ट्र राज्य पुरस्कार, हरि नारायण आपटे पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळाले. १९९०मध्ये त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशा या महान लेखकाचे सहा मार्च १९९२ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतींना वंदन!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment