बोधकथा - ४
स्वामी रामतीर्थ अमेरिकेला चालले होते तेव्हाची गोष्ट. ते ज्या जहाजात बसले होते, त्यातून सुमारे दीडशे जपानी विद्यार्थी अमेरिकेला चालले होते. स्वामीजींचा त्यांच्याशी परिचय झाला आणि ते विद्यार्थी स्वामीजींच्या ज्ञानाने फारच प्रभावित झाले. त्या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण श्रीमंत कुटुंबातील होते.
स्वामीजींनी त्यांना बोलता बोलता विचारले, 'तुम्ही सर्व अमेरिकेला शिक्षणासाठी का जात आहात?' आपण विशेष अध्ययनासाठी जात असल्याचे सर्वांनी स्वामीजींना सांगितले, तेव्हा स्वामीजींनी त्या सर्वांना सहज प्रश्न केला, 'बरं, हे सांगा, बरेच दिवस तुम्ही अमेरिकेत राहणार आहात, तर त्यासाठी पैशांची व्यवस्था काय केली आहे?'
स्वामीजींच्या या प्रश्नाचे उत्तर त्या विद्यार्थ्यांनी दिले, 'स्वामीजी आम्ही तर या जहाजाचे भाडेही सोबत आणलेले नाही. जहाजात काही काम करून त्याचे भाडे देऊ आणि अमेरिकेतही आपल्या शिक्षणाचा खर्च एखादी नोकरी करून भागवू. आपल्या राष्ट्राचे धन व्यर्थ विदेशात का खर्च करावे?'
स्वामी रामतीर्थांनी पाहिले, की सर्व विद्यार्थी जहाजात सफाई आणि छोटे-मोठे काम करून जहाजाचे भाडे जमा करीत होते. त्यांचे देशप्रेम पाहून स्वामीजी फारच प्रसन्न झाले आणि मनात विचार करू लागले, की विदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनीही असा विचार केल्यास भारताला संपन्न राष्ट्र बनायला वेळ लागणार नाही.
तात्पर्य : देशातील साधनांचा, धनाचा सदुपयोग ही अशी राष्ट्रसेवा आहे, की ज्यामुळे राष्ट्र जलदगतीने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकते.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment