बोधकथा २२
एकदा वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारले, 'कारला ब्रेक्स का असतात?'
एका विद्यार्थ्याने उठून उत्तर दिले, 'सर, कार थांबवण्यासाठी!' दुसर्या विद्यार्थ्याने उत्तर दिले, 'गाडीचा वेग कमी आणि नियंत्रित करण्यासाठी.' तिसरा म्हणाला, 'अपघात टाळण्यासाठी.'
चेहऱ्यावर हसू आणून शिक्षक म्हणाले, 'मला तुमच्या सर्व उत्तरांचे कौतुक आहे; पण मी काय सांगतो ते नीट ऐका. गाडीला शक्य तितक्या वेगाने जाता यावे, म्हणून ब्रेक्स असतात!'
वर्गात एकदम शांतता पसरली. या उत्तराची कोणालाच अपेक्षा नव्हती.
शिक्षक पुढे म्हणाले, 'आपल्या गाडीला ब्रेक्स नाहीत असे क्षणभर समजू या. आता आपण किती वेगाने गाडी चालवू शकू? हे ब्रेक्स आहेत, म्हणून आपण गाडी वेगाने चालवण्याचे आणि शक्य तितक्या लवकर आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्याचे धाडस करू शकतो!'
वर्गातील सर्व विद्यार्थी विचारात पडले. त्यांनी याआधी अशा पद्धतीने ब्रेक्सचा विचारच केला नव्हता.
बोध : आयुष्यात असे अनेक ब्रेक्स येतात, ते आपल्याला निराश करतात. आपल्या आजूबाजूची अनेक मंडळी आपल्याला आपल्या प्रगतीची दिशा किंवा जीवनातील निर्णयांबद्दल प्रश्न विचारतात. त्यांच्या प्रश्नांकडे आणि जीवनातील कठीण प्रसंगांकडे आपण अडथळा म्हणून पाहतो आणि त्यामुळे आपला वेग कमी होतो असे आपल्याला वाटते; पण त्याकडे आपण आपल्याला धोका पत्करण्यास सक्षम करणारे साधन म्हणून पाहिले तर? कारण, कधी कधी थांबावे लागते. अगदी काही पावले मागे जावे लागते; पण त्यामुळे आपण एक मोठी झेप घेऊ शकतो. असे प्रश्न आणि परिस्थितींमुळेच आपण आज जिथे आहोत तिथे पोहोचू शकलो आहोत. आयुष्यात या ब्रेकशिवाय आपण घसरू शकतो, दिशा हरवू शकतो किंवा दुर्दैवी अपघाताला बळी पडू शकतो. ब्रेक आपल्याला मागे ढकलण्यासाठी किंवा आपल्याला बांधण्यासाठी नसतात. त्याऐवजी ते आपल्याला पूर्वीपेक्षा वेगाने पुढे जाण्यास मदत करतात, जेणेकरून आपण आपल्या गंतव्यस्थानी जलद आणि सुरक्षितपणे पोहोचू शकू.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment