बोधकथा - २८
एका ठिकाणी बांधकाम चालू होतं. भगवान श्रीकृष्णाच्या भव्य मंदिराचं ते काम होतं. तीन मजूर तिथे दगड उचलण्याचं काम करत होते. काम थकवणारं होतं!
एका व्यक्तीने पहिल्या मजुराला विचारलं, 'तुम्ही काय करत आहात?' तो त्रासिकपणे जोरात उत्तरला, 'दिसत नाही का दगड उचलतोय ते? काम संपवू द्या मला माझं...'
मग दुसऱ्या मजुराला विचारण्यात आलं, 'तुम्ही काय करताय?' तो यांत्रिकपणे म्हणाला, 'मजुरी करतोय... बायका-मुलांना पोसणं तर जरूरीचं आहे... म्हणून दगड उचलतोय.'
शेवटी तिसऱ्या मजुराला तोच प्रश्न विचारला. तो आनंदाने म्हणाला, 'इथे भव्य कृष्णमंदिर उभारलं जाणार आहे. इथे मला मजुरीचं काम मिळालं हे माझं भाग्यच! या मंदिरासाठी दगड उचलून मी माझा वाटा उचलतोय... '
काम सारखंच... दगड उचलण्याचं आणि मोबदलाही सारखाच... पण काम कोणत्या भावनेनं केलं यावर त्यातून मिळणारा आनंद आणि मिळणारं समाधान हे वेगवेगळं!
कोणतंही काम करताना असणारा भाव आणि इरादा याच गोष्टी आपल्याला आपल्या कामातून मिळणारा आनंद आणि त्याची गुणवत्ताही ठरवतात.
जबरदस्तीने केलेलं कोणतंही काम सफल होत नाही. पर्याय नसल्यामुळे केलेलं काम कसंबसं रेटलं जातं; पण त्याचा आनंद मिळत नाही. पूर्ण मन लावून केलेलं काम आनंदही देतं आणि सफलही होतंच. मग काम कोणतंही असो, घरातलं, ऑफिसचं, अभ्यासाचं वा व्यायामाचं... त्यामागचा हेतू कसा आहे यावरच त्यातली आपली तन्मयता आणि नंतर मिळणारं यश अवलंबून असतं.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment