थोर स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांचे थोरले बंधू शरदचंद्र बोस यांचा २० फेब्रुवारी हा स्मृतिदिन.
सुभाषचंद्र बोस यांचे थोरले बंधू शरदचंद्र बोस यांचा २० फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्यांचा जन्म सात सप्टेंबर १८८९ रोजी कटक येथे झाला. त्यांनी कलकत्त्यात आपले शिक्षण पूर्ण केले आणि पुढील कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला प्रस्थान केले. १९१३ साली बॅरिस्टर पदवी संपादन करून ते भारतात परतले आणि त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. देशबंधू चित्तरंजन दास यांच्या देशभक्तीचा त्यांच्यावर खोल प्रभाव पडला. स्वराज्य चळवळीत ते त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक होते. कायदेभंग चळवळ, तसेच दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.
ते काही काळ बंगाल प्रांतिक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सदस्यही होते. १९३७ पासून सुमारे सात-आठ वर्षे त्यांनी बंगाल विधानमंडळात विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी सांभाळली. स्वातंत्र्यलढ्यात आपल्या पराक्रमी धाकट्या भावाबरोबर ते कायम अग्रभागी राहिले. पुढे काँग्रेसशी त्यांचे मतभेद झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसविरोधी डाव्या विचारसरणीच्या गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि संयुक्त समाजवादी संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या प्रचारासाठी त्यांनी भारतभर दौरे केले. युरोप दौर्यात त्यांनी इंग्लंड, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड यांसारख्या देशांना भेटी दिल्या.
अखेरच्या काळात त्यांना हृदयविकाराचा त्रास होत होता. काही महिने ते आजारी होते; मात्र प्रकृती सुधारत असल्याचे दिसत होते. फाल्गुन शुद्ध तृतीया, शके १८७१ म्हणजेच २० फेब्रुवारी १९५० रोजी दुपारी सुमारे तीन वाजेपर्यंत त्यांनी आपल्या ‘नेशन’ या वृत्तपत्रासाठी लेखही लिहिला; मात्र रात्री उशिरा त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment