महाराष्ट्र दिन

एक मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

महाराष्ट्र दिन मुख्य फोटो
मुख्य फोटो

भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता आणि भारतातील अनेक राज्ये सारखीच होती; पण हळूहळू ही राज्ये भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर विभागली गेली आणि अशा प्रकारे भारतातील अनेक नवीन राज्ये निर्माण झाली. त्यामुळे भारतातील जवळजवळ सर्व राज्ये दर वर्षी आपापल्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करतात आणि त्याच प्रकारे, महाराष्ट्रात दर वर्षी मे महिन्यात महाराष्ट्र दिन अर्थात आपल्या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो. एक मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

 महाराष्ट्र हे वेगळे राज्य कसे झाले? 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर बहुतांश प्रांतीय राज्ये बॉम्बे प्रांतात विलीन करण्यात आली. त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. कालांतराने भाषेच्या आधारे वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली. गुजराती भाषेतील लोकांना स्वतःचे वेगळे राज्य हवे होते. त्याचवेळी मराठी भाषा बोलणारे लोक स्वत:साठी वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी करत होते. या दरम्यान देशात अनेक आंदोलनेही झाली आणि या चळवळींचा परिणाम म्हणून १९६० मध्ये मुंबई पुनर्रचना कायदा अमलात आला. या कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली. 

वास्तविक अनेक राज्ये राज्य पुनर्रचना कायदा- १९५६अंतर्गत निर्माण झाली. या कायद्याच्या आधारे कन्नड भाषा बोलणाऱ्या लोकांना म्हैसूर राज्य म्हणजेच कर्नाटक राज्य देण्यात आले. तेलुगू भाषेतील लोकांना आंध्र प्रदेश राज्य मिळाले. त्याच वेळी मल्याळम भाषेच्या लोकांना केरळ आणि तमिळ भाषेच्या लोकांना तामिळनाडू राज्य मिळाले. पण मराठी आणि गुजराती लोकांना स्वतःचे वेगळे राज्य मिळाले नाही. त्यानंतर या लोकांनी स्वत:साठी स्वतंत्र राज्याची मागणी करत अनेक आंदोलने सुरू केली.

१९६०मध्ये जिथे एका बाजूला गुजरात राज्य निर्माण करण्यासाठी चळवळ सुरू झाली. त्याच वेळी महाराष्ट्र राज्याच्या मागणीसह संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. १ मे १९६० रोजी भारताच्या सरकारने बॉम्बे राज्याचे दोन राज्यांमध्ये विभाजन केले. मराठी भाषक लोकसंख्येसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि गुजराती भाषक लोकसंख्येसाठी गुजरात राज्याची निर्मिती झाली. पण त्याच दरम्यान या दोन राज्यांमध्ये मुंबईवरुन भांडण सुरू झाले, ही मुंबई त्याकाळी आर्थिक व्यवहारांचे केंद्र होते. महाराष्ट्र राज्यातील लोकांना मुंबई हा त्यांच्या राज्याचा भाग हवा होता, कारण तेथील बहुतांश लोक मराठी बोलत होते. त्याच वेळी मुंबईच्या प्रगतीत आपला वाटा जास्त आहे, या भावनेने गुजराती लोकांना मुंबई आपल्या राज्याचा भाग म्हणून हवी होती. अखेरीस मुंबई महाराष्ट्राचा भाग बनली. त्याच सुमारास, जेव्हा भारत सरकारने गोवा राज्य पोर्तुगीजांपासून स्वतंत्र केले तेव्हा महाराष्ट्र राज्याला आपल्या राज्याचा एक भाग बनवायचा होता. परंतु गोव्यातील जनतेने स्वत:साठी स्वतंत्र राज्याची मागणी केली आणि त्यामुळे गोवा महाराष्ट्र राज्यात सामील होऊ शकला नाही.

हा तर झाला मुंबईसह महाराष्ट्र राज्याचा निर्मितीचा इतिहास मात्र महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा उदय नेमका कधी आणि केव्हा झाला याबाबत अनेक मतभिन्नता असलेली आपणास आढळून येते- 

• इ. स. पूर्व दुसऱ्या शतकातील सातवाहनाच्या नाणेघाटातील लेखामध्ये ‘महारठ्ठ’ असा उल्लेख केलेला दिसतो.

• महाराष्ट्र या नावाचा सर्वांत प्राचीन पुरावा हा आपणास सम्राट अशोक यांच्या शिलालेखामध्ये आढळून येतो. या शिलालेखामध्ये या प्रदेशाचे ‘महारडु’ असे नाव ठेवण्यात आले होते. या नावावरून मग आधुनिक काळात याच प्रदेशाचे महाराष्ट्र राज्य असे नामकरण करण्यात आले होते.

• उत्तरेस आर्य आणि दक्षिणेस द्रविड लोक राहायचे. यात विंध्य पर्वताच्या दक्षिणेच्या प्रदेशाला दक्षिणपथ म्हटल जायचे. यामध्ये कलिंग, आंध्र, सौराष्ट्र, आर्यावर्त, अपरांत, कुंतल व देवराष्ट्र इत्यादी भू-भागांचा उल्लेख करण्यात आलेला आपणास दिसतो. 

• सर्वप्रथम कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथातही अश्मक व अपरान्त भागातील पावसाच्या प्रमाणाचा उल्लेख करण्यात आला आहे, हा भागही महाराष्ट्र राज्याचा एक भाग असावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

• इ. स. पूर्वी तिसर्‍या शतकात सम्राट अशोक यांच्या काळात ‘महारड़’ प्रदेशात धर्मोपदेशकांना बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी पाठवल्याचा उल्लेख आपणास शिलालेखातून प्राप्त होतो.

महाराष्ट्र राज्याविषयी संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्याची स्थापना - १ मे १९६०

राजधानी – मुंबई 

उपराजधानी – नागपूर

राज्यभाषा – मराठी

एकूण जिल्हे – ३६

एकूण तालुके – ३५५

एकूण ग्रामपंचायती – २८,८१३

एकूण पंचायत समित्या – ३५५

एकूण जिल्हा परिषदा – ३४

एकूण विधानसभा आमदार – २८८

विधानपरिषद आमदार – ७८

महाराष्ट्र लोकसभा सदस्य – ४८

भारत देशामध्ये महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक – २ रा

भारत देशामध्ये महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या बाबतीत क्रमांक – ३ रा

भारत देशातील एकूण लोकसंख्येच्या ९.२९ % लोकसंख्या महाराष्ट्रातील आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा – पुणे ( ९४.३ लाख )

महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेला जिल्हा – सिंधुदुर्ग ( ८.५० लाख )

महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा – गडचिरोली

महाराष्ट्रातील सर्वांत कमी जंगल असलेला जिल्हा – बीड

महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा – गोंदिया

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वांत मोठा जिल्हा – अहिल्यानगर

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वांत लहान जिल्हा – मुंबई शहर

महाराष्ट्रातील उंच शिखर – कळसूबाई १६४६ मी.

महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी – गोदावरी

महाराष्ट्रात सर्वांत जास्त लांबीचा समुद्रकिनारा असलेला जिल्हा – रत्नागिरी

जगातील सर्वांत पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ असलेला जिल्हा – नागपूर

महाराष्ट्रातील संपूर्ण डिजिटल पहिला जिल्हा – नागपूर ( ऑक्टोबर २०१६)

महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा

वायव्येस – सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या,

उत्तरेस – सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.

ईशान्येस – दरेकासा टेकड्या.

पूर्वेस – चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.

दक्षिणेस – हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.

पश्चिमेस – अरबी समुद्र.

राजकीय सीमा व सरहद्द –

वायव्येस – गुजरात व दादरा नगर हवेली

उत्तरेस – मध्य प्रदेश

पूर्वेस – छत्तीसगड

आग्नेयेस – आंध्र प्रदेश

दक्षिणेस – कर्नाटक व गोवा

राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे

गुजरात – पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे

दादरा नगर हवेली – ठाणे, नाशिक  

मध्य प्रदेश – नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया

छत्तीसगड – गोंदिया, गडचिरोली

आंध्र प्रदेश – गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड

गोवा – सिंधुदुर्ग

महाराष्ट्राची लांबी, रुंदी आणि क्षेत्रफळ

लांबी – पूर्व – पश्चिम – ८०० किमी

रुंदी – दक्षिण – उत्तर – ७२० किमी

क्षेत्रफळ – ३,०७, ७१० चौ. किमी.

समुद्रकिनारा – ७२० किमी.

असा आपला हा महाराष्ट्र! नावाप्रमाणेच महान संस्कृती, भाषेची समृद्धी, संतांची भूमी, क्रांतिकारकांची जननी. देशाची आर्थिक पायाभरणी या राज्यातूनच होते. देशाच्या प्रगतीचा मार्ग महाराष्ट्रातूनच जातो. थोर कवी गोविंदाग्रज अर्थात राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या या कवितेत महाराष्ट्राचे किती सार्थ वर्णन केले आहे पाहा!


मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा। प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ॥धृ.॥ 

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा| नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ॥

अंजनकांचनकरवंदीच्या कांटेरी देशा। बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा ॥१॥ 

भावभक्तिच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा। शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा ॥

ध्येय जें तुझ्या अंतरी, निशाणावरी नाचतें करीं।जोडी इहपरलोकांसी व्यवहारा परमार्यासी वैभवासि वैराग्यासी॥

जरिपटक्यासह भगव्या झेंडयाच्या एकचि देशा। प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा॥२॥

अशा या कणखर महाराष्ट्राला प्रणाम !!


(संदर्भ- वेबदुनिया वेबसाइट, रोजगार मराठी वेबसाइट)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 01-05-2026 News publication date | Time: 02:55 AM News publication time | Views: 596 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 01-05-2026 News publication date | Time: 02:55 AM News publication time | Views: 596 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement