शिखांचे दहावे गुरू अर्थात गुरू गोविंदसिंग यांच्या पुत्रांच्या (साहिबजादे) सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ २६ डिसेंबरला साजऱ्या होणाऱ्या या दिवसानिमित्त...
भारतात दर वर्षी २६ डिसेंबर रोजी वीर बाल दिवस साजरा केला जातो. हा दिवस शिखांचे दहावे गुरू अर्थात गुरू गोविंदसिंग यांच्या पुत्रांच्या (साहिबजादे) सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा होतो. गुरू गोविंदसिंग यांचे दोन धाकटे सुपुत्र — साहिबजादा जोरावर सिंग (नऊ वर्षे) आणि साहिबजादा फतेह सिंग (सहा वर्षे) यांच्या अतुलनीय शौर्याला आणि बलिदानाला श्रद्धांजली वाहणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. १७०५ साली मुघल शासक वजीर खान याने या दोन्ही साहिबजाद्यांना आपला धर्म बदलण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपला धर्म सोडण्यास ठाम नकार दिल्यावर, त्यांना २६ डिसेंबर १७०५ रोजी जिवंत असतानाच भिंतीत गाडले गेले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ जानेवारी २०२२ रोजी गुरू गोविंदसिंग यांच्या प्रकाश पर्वानिमित्त २६ डिसेंबर हा वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. हा दिवस तरुण पिढीला धैर्य, त्याग आणि आपल्या मूल्यांप्रति असलेल्या निष्ठेची प्रेरणा देतो. आजच्या काळात, हा दिवस केवळ शीख समुदायासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी राष्ट्रभक्ती आणि स्वाभिमानाचे प्रतीक बनला आहे.
(संकलित माहिती)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment