ईडीपी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप
धुळे : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेने धुळ्यात आयोजित केलेल्या उद्योजकता विकास प्रशिक्षणवर्गाचा (ईडीपी) नुकताच समारोप झाला. दहा दिवसांच्या सखोल प्रशिक्षणानंतर नवउद्योजकांचा वाढलेला आत्मविश्वास आणि उद्योग सुरू करण्याची तयारी स्पष्टपणे दिसून आली.
या १० दिवसांच्या वर्गामध्ये व्यवसायाची संकल्पना, योग्य व्यवसाय निवड, व्यक्तिमत्त्व विकास, मार्केटिंग कौशल्ये, व्यवसाय नोंदणी प्रक्रिया, शासनाच्या विविध योजना, आर्थिक नियोजन, तसेच सूक्ष्म व लघुउद्योग उभारणी यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
'१० दिवसांच्या या प्रशिक्षणामुळे आमचा आत्मविश्वास वाढला असून, आता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत,' अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया लाभार्थ्यांकडून व्यक्त झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमृत संस्थेचे धुळे जिल्हा व्यवस्थापक हेमंत पाठक, अमृतमित्र विलास चंद्रात्रे, अमृतसखी वैशाली कुलकर्णी यांनी सर्वांनी विशेष परिश्रम घेतले. समारोप समारंभात समाधान, आनंद आणि नव्या स्वप्नांची सुरुवात यांचा संगम अनुभवायला मिळाला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment