आठ दिवसांच्या प्रशिक्षणातून घडतील नवउद्योजक
नंदुरबार : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच अमृत उद्योग कौशल्यवर्धन हा उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. समुत्कर्ष क्लासमध्ये १७ मार्च रोजी सुरू झालेला हा कार्यक्रम आठ दिवसांचा आहे. त्यात व्यवसाय व्यवस्थापन आणि उद्योजकता विकासाच्या विविध पैलूंचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अॅड. रोहन गिरासे, उद्योजक नानाभाऊ माळी, श्री. राजपूत, अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे, ललित महाजन आदी उपस्थित होते. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 1 Comments
दिनेश पाठक
प्रारंभ शुभेच्छा...! असे कार्यक्रम नंदुरबार मध्ये आता साततत्याने होतील ही अपेक्षा व नंदुरबार मधील अमृत चे लाभार्थी जास्तीत जास्त संख्येने वाढो ह्या शुभेच्छा..!💐🌹
Write a Comment