जालना जिल्ह्यात नावनोंदणी सुरू; खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना सुवर्णसंधी
जालना : स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेने अमृत कौशल्य उद्यम वर्धन – लघु उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. कौशल्याधारित उद्योजकता विकसित करून आर्थिक स्वावलंबन साधणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. जालना जिल्ह्यातही त्यासाठी नावनोंदणी सुरू झाली आहे.
अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. त्यासाठी विविध योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रम संस्थेतर्फे राबवले जातात. अमृत कौशल्य उद्यम वर्धन या प्रशिक्षण कार्यक्रमात उद्योग उभारणीची मूलभूत संकल्पना, व्यवसायाची योग्य दिशा निवडणे, उत्पादन प्रक्रिया, खर्च नियंत्रण व नफा व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. यासोबतच ब्रँडिंग, ट्रेडमार्क नोंदणी, आर्थिक नियोजन, तसेच शासनाच्या विविध योजनांचा उद्योगासाठी प्रभावी वापर कसा करावा, याबाबत तज्ज्ञांकडून माहिती देण्यात येणार आहे.
डिजिटल युगाची गरज लक्षात घेऊन प्रशिक्षणार्थींना अमृतपेठ या ई–कॉमर्स विक्री माध्यमाची ओळख करून देण्यात येणार असून, त्याद्वारे जालना जिल्ह्यातील लघु उद्योगांची उत्पादने संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवता येणार आहेत. त्यामुळे स्थानिक उद्योगांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊन रोजगारनिर्मितीला चालना मिळेल.
अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घेता येणार असून ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, त्यागी, नायडू, राजपुरोहित आदी समाजघटकांतील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेले नागरिक या प्रशिक्षणासाठी पात्र ठरणार आहेत.
जालना जिल्ह्यातील युवक-युवती व उद्योजकांनी स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे.
नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :
नितीन खेकाळे – 7391065474
जालना जिल्हा व्यवस्थापक, अमृत
चिंतेश जोशी – 9421944752
जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
Comments 1 Comments
संतोष नारायणराव इसादकर
अमृत योजना समजुन घेणे व उद्योगाची सुरुवातीची पाया भरणी करणे
Write a Comment